भाडे तत्वावरील दुकान वाटप प्रक्रियेत अनियमितता, भेदभाव व पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप
खडकी | प्रतिनिधी : दि. 19 मे 2026
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दुकानांच्या भाडे तत्वावरील वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता, भेदभाव आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत अभिजीत मनोज गडांकुश यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, एका विशिष्ट वर्गासाठी तब्बल 55 दुकाने भाडे तत्वावर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रीय खेळाडूंसाठी आरक्षित कोटा राखीव ठेवण्यात आला असताना, मागासवर्गीय, खडकीतील रहिवासी, महिला आणि व्यक्तींसाठी कोणतीही दुकाने उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे संविधानातील समानतेच्या तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच डोमिसाइल (रहिवाशी दाखला ) अट केवळ फेरीवाले आणि सामान्य रहिवाशांवर लागू करण्यात येत असून, दुकानमालक किंवा भाडेकरूंवर ती लागू नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही दुहेरी भूमिका असल्याचे गडांकुश यांनी म्हटले आहे.
लिलाव प्रक्रिया जाणूनबुजून विलंबित करून काही स्थानिक प्रस्थापित आणि विशिष्ट लोकांना फायदा पोहोचवण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. प्रथम विद्यमान दुकानदारांवर डोमिसाइलसह इतर अटी कठोरपणे लागू करण्यात येतात, मात्र त्यानंतर नवीन अर्जदारांवर त्या अटी शिथिल केल्या जात असल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
मूळ मालकांनी दुकाने भाडे तत्वावर देऊन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत (2021 ते 2026) दुकानांसाठी किती अर्ज प्राप्त झाले, कोणत्या वर्गातील अर्ज होते आणि त्यावर काय कारवाई करण्यात आली याची संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सध्या आठ दुकाने रिक्त असल्याचे समजत असून, त्यांचा लिलाव कधी व कोणत्या पद्धतीने होणार याची माहिती नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. सर्व रिक्त दुकाने पारदर्शक पद्धतीने लिलाव प्रक्रियेतून स्थानिक नागरिकांना प्राधान्य देऊन वाटप करण्यात यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, सात दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















